2016 पासून सुरू झाला आहे उपक्रम
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
1 ते 30 सप्टेंबरपर्यंत ठिकाठिकाणी होणार वृक्ष लागवड
पुणे – राज्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या “वनमहोत्सव’ या उपक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. महोत्सवासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून यंदा उदिष्टापेक्षाही जास्त वृक्ष लागवड करण्याचा दावा वन विभगातर्फे करण्यात आला आहे.
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या “वनमहोत्सव’ या उपक्रमाची सुरुवात 2016 साली झाली होती. पाच वर्षांत 50 कोटी झाडांची लागवड करायची असा या योजनेचा मूळ उद्देश असून त्याअंतर्गत प्रतिवर्षी ठरविक उद्दिष्ट ठरवून तेवढ्या संख्येने वृक्षारोपण केले जाते. यंदा राज्यात 33 कोटी वृक्षांची लागवडीचे उद्देश ठरविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 2 कोटी, 4 कोटी आणि 13 कोटी इतक्या वृक्ष लागवड करण्यात आली असून या उपक्रमासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
यासाठी वनविभागासहित, इतर राज्य आणि केंद्र शासनाचे सर्व विभाग, खाजगी कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असणार आहे. तसेच शासनाकडून नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी हरित सेना, कन्या वनसमृद्धी योजना, लघू उत्पन्न शेतकरी योजना यासारख्या विविध योजनादेखील राबविण्यात येत आहे. त्यामुळेच यंदाचा हा उपक्रम आणखी यशस्वी होईल, असा विश्वास शासनाकडून व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. या महोत्सवाचा प्रारंभ चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन मियावाकी उद्यानाचा वनमहोत्सवाचे उद्घाटन करून केला जाणार आहे.