पुणे – “गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हातात भाजपचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप सुरू आहे. अनेक संस्थांच्या अधिकारावर गदा आणून त्या संपुष्टात आणल्या जात आहेत; तर दुसऱ्या बाजूला देशाचे माजी न्यायाधीश लोकशाही धोक्यात असल्याचे संकेत देतात. त्यामुळे देशाला वाचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली खेचा,’ असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराची सांगता सभा मंडई येथे रविवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार ऍड. वंदना चव्हाण, उमेदवार मोहन जोशी यांच्यासह महाआघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंगने वादग्रस्त विधान करूनही देशाचे पंतप्रधान त्यांचे समर्थन करतात. यापेक्षा दुसरी कोणती घृणास्पद गोष्ट होऊ शकत नाही. दोन कोटी रोजगार देऊ, अशी आश्वासने देणारे आज पकोडे विकायला सांगत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.