नवी दिल्ली – बलात्काराच्या आरोपावरून खटला दाखल करण्यात आलेले वादग्रस्त अध्यात्मिक धर्मगुरू आसाराम बापू यांचा जामीनावर सुटका करण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. न्या एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी न्यायालयाने नमूद केली की या प्रकरणाची सुनावणी आता सुरू होणार असून या प्रकरणात 210 साक्षीदार तपासले जाणार आहेत असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.
या प्रकरणात सुनावणी सुरू करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला दिला आहे. हे प्रकरण गुजरातमधील आहे. सूरत येथील दोन बहिणींनी आसाराम व त्यांचे चिरंजीव नारायणसाई याच्या विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदेशीरपणे डांबून ठेऊन बलात्कार केल्याचा या बहिणींचा त्या पितापुत्रांवर आरोप आहे.