राधाकृष्ण विखे पाटील : आ. बाळासाहेब थोरातांवर केली टीका
संगमनेर – अभिनंदनाचे पोस्टर फाडल्याने खासदार डॉ. सुजय विखे यांचे महत्त्व कमी होत नाही. मात्र काही लोकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. संगमनेर तालुक्यातील जनताच त्यांचा बंदोबस्त करेल, अशी इशारा, वजा टीका माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे विरोधक असलेल्या माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरांत यांच्यावर केली.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील माजी मंडलाधिकारी दादा पाटील आहेर यांच्या मातुश्री सत्यभामा आहेर यांचे नुकतेच निधन झाले. आहेर कुटुंबाच्या सांत्वनासाठी विखे आले असता, ते बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष किशोर डोके, शिवाजी आहेर, सोपान भोर, नितीन आहेर, सुरेश आहेर, शांताराम गाडेकर, शिवाजी आहेर, कैलास आहेर, जगदीश आहेर, दिलीप आहेर यासह पठार भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखे पुढे म्हणाले, यंदा दुष्काळाची तीव्रता भायानक आहे.
सरकारने पाणी टंचाई लक्षात घेता उपाययोजना कारणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे इतर स्रोत नसल्याने सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे. पठार भागात दुष्काळाची तीव्रता पाहता पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊ. घारगाव येथील वरिष्ठ महाविद्यालय बंद झाले असून, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास बाहेर गावी जावे लागते. त्यासाठी मी पुढील काळात लक्ष घालणार असल्याचे ही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विखे पाटील हे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय झाले असून, त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत गाठी भेटी वाढवल्या आहेत. विखे यांच्याबरोबर भाजपत जाणाऱ्या आमदारांच्या भेटीही विखे संगमनेरातच घेत आहेत. बुधवारी दिवसभर विखे यांनी तालुक्यात अनेकांच्या भेटी घेतल्याने आगामी काळात विखे आणि थोरात यांच्यातील वाद आणखी पेटणार, असे बोलले जात आहे.