पाकिस्तानला अख्तरकडून घरचा आहेर
मॅंचेस्टर – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्याच माजी खेळाडू व प्रसार माध्यमांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या गेलेल्या शोएब अख्तर याने कर्णधार सर्फराझ अहमद हा बिनडोक असल्याची टीका केली आहे.
अख्तर याने सांगितले की, सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा होता. नाणेफेक जिंकल्यानंतर खरतर फलंदाजी घेण्याची आवश्यकता होती. जरी हवामान वेगवान गोलंदाजीस पोषक होते तरीही पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. साहजिकच डकवर्थ लुईसचा नियम लावला जाण्याची शक्यता होती. अशा नियमाचे वेळी धावांचे लक्ष्य ज्या संघापुढे ठेवले जाते अशा संघास बऱ्याच वेळा पराभच झाला आहे. अशी उदारहणे माहीत असूनही सर्फराझ याने क्षेत्ररक्षण घेतले. तिथूनच आमचा पराभव निश्चित झाला होता. धावांचा पाठलाग करीत विजय मिळविण्याची क्षमता पूर्वीच्या खेळाडूंमध्ये होती. सध्याचा संघ अशा तंत्रात बसू शकत नाही.
हसन अली याच्यावर कडाडून टीका करीत अख्तर म्हणाला की, हा गोलंदाज येथे नेमका कशासाठी आला आहे. जर तो एका सामन्यात 82-84 धावा देत असेल तर त्याला आमच्या संघात राहण्याची योग्यता नाही. तो धड वेगाने चेंडू टाकू शकत नाही. त्याच्याकडे प्रभावी स्विंग टाकण्याची क्षमता नाही. बहुदा त्याच्या डोळ्यापुढे टी-20 सामनाच असावा. माझ्या दृष्टीने तो आमच्या राष्ट्रीय सामन्यांमध्येही बसू शकत नाही.