तिसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 प्रवेशाची दुसरी फेरी येत्या 20 मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर तिसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये “आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेश देण्यात येतात. या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना करण्यात येते. यंदा राज्यातील 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत.
यासाठी 2 लाख 44 हजार 932 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीत 67 हजार 706 विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता. मात्र यातील 46 हजार 899 विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्चित झाला आहे. उर्वरित 20 हजार 807 विद्यार्थ्यांचे प्रवेशच पालकांनी घेतले नाहीत. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी एकूण तीनच फेऱ्या घेण्याचे आधीच ठरविले आहे. त्यामुळे आता प्रवेशाची दुसरी फेरी घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पालकांच्या रहिवाशी ठिकाणापासून 1 कि.मी.अंतरापर्यंतच्या शाळाप्रवेशासाठी पहिली फेरी राबविण्यात आली. आता 1 ते 3 कि.मी अंतरापर्यंतच्या शाळांमधील प्रवेशासाठी दुसरी फेरी व 3 कि.मी.पेक्षा जास्त अंतराच्या शाळांमधील प्रवेशासाठी तिसरी फेरी घेण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये “आरटीई’ प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षीही 66 टक्क्यांपर्यंतच प्रवेश घेण्यात आले होते. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घ्यावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वाधिक रिक्त जागा पुण्यातच
सिंधुदुर्ग-41, नंदुरबार-62, रत्नागिरी-75, हिंगोली-187, सांगली-316, पालघर-90, गडचिरोली-197, वाशिम- 200, उस्मानाबाद-243, कोल्हापूर-501, परभणी-341, भंडारा-217, गोंदिया-153, धुळे-181, चंद्रपूर-362, सातारा-233, सोलापूर-255, वर्धा-292, यवतमाळ-464, लातूर-476, बुलढाणा-466, अहमदनगर-389, बीड-432, अकोला-475, जळगाव-588, अमरावती-621, रायगड-661, नांदेड-689, मुंबई-1271, जालना-633, नाशिक-1030, औरंगाबाद-1,345, नागपूर-1,797, ठाणे-1,939, पुणे-3,583.