शिक्षण विभागाचे आदेश पाळले जात नसल्याचा आरोप “आप’ पालक युनियन आंदोलनाच्या पवित्र्यात
पुणे – “आरटीई’ अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या अशोकनगर येथील एसईएसच्या गुरुकुल शाळेवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा “आप’ पालक युनियनने दिला आहे. यंदाच्या वर्षी बहुसंख्य शाळांनी आपल्या एन्ट्री लेवेलचा प्रवेश वर्ग हा नर्सरी बदलून पहिली केला आहे. शाळांना त्यांची “आरटीई’अंतर्गत रिक्त जागांची नोंद करण्यास आठवड्यापेक्षा जास्त कालावधी दिला होता. त्यामध्ये गुरुकुल शाळेकडून 15 जागा रिक्त दाखवल्या होत्या. त्यास शाळेने कोणताही आक्षेप घेतला नाही. त्याप्रमाणे पालकांना प्रवेशासाठी सूचना दिली गेली. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करुनही शाळेने काही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत.
पालकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर शिक्षण विभागाकडून शाळेची सुनावणी झाली. त्यात शाळेने पडताळणी झालेल्या 8 मुलांचे प्रवेश निश्चित करण्याचे लेखी आदेश मागितले. या शाळेत प्रवेश मिळेल या आशेवर पालकांनी रजा शाळा, महापालिका शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद या कार्यालयांकडे फेऱ्या मारल्या आहेत. गुरूकुल शाळेची मान्यता रद्द करावी अथवा शासनाकडून शाळेला देण्यात आलेली सिंचन विभागाची काढून घेण्यात यावी, असा निर्णयही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी सुनावणीत जाहीर केला होता. जुलै 2014 मध्ये या सारख्याच अनेक तक्रारीमुळे मुंबई उच्च न्यायालयाने शासनास तक्रार निवारण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले होते व तातडीने निर्णय घेण्यासाठीची पद्धती ठरवण्यास सांगितले होते. पाच वर्षानंतरही प्रवेशाबाबत गोंधळ अजूनही सुरूच असून शासनाकडून काही कारवाई केली जास्त नाही. याबाबत आप पालक युनियनचे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागाचे आदेश शाळांकडून पाळले जात नसल्याने संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी व वंचित घटकांचा शिक्षण हक्क नाकारला जात असल्याने प्रशासकीय दिरंगाईबद्दल महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई सुरू होणे आवश्यक आहे, अशी मागणी आप पालक युुनियनचे मुकुंद किर्दत यांच्यासह इतर पालकांकडून करण्यात आली आहे.