राजनारायण हे भारतीय राजकारणातील एक वेगळेच नेते होते. कुणाला काहीही वाटले, चांगले वाटू दे अथवा वाईट ते आपल्या मनात येईल ते चटकन बोलून मोकळे व्हायचे. एकदा पुण्यामध्ये समाजवादी पक्षाचे संमेलन सुरू होते. त्याचदरम्यान मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली. इंदिरा गांधींनी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची आणि राजघराण्यांना मिळणाऱ्या तनखा बंद करण्याची घोषणा करून आपली छबी गरीबहितैषी बनवली होती.
“गरिबी हटाव’चा नारा देऊन इंदिराजी रिंगणात उतरल्या होत्या. साहजिकच, समाजवादी पक्षाच्या संमेलनामध्ये इंदिराजींच्या विरोधात रायबरेलीमधून कोण निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू होती. त्यावेळी राजनारायण उभे राहिले आणि म्हणाले की, माझ्याशिवाय इंदिरा महाराणींविरुद्ध कोण लढणार? यावर सर्वांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर राजनारायण म्हणाले की, जिंकण्यासाठी नव्हे तर हारण्यासाठी मी ही निवडणूक लढवायला निघालो आहे.
प्रत्यक्षात निवडणूक हारल्यानंतर त्यांनी सरकारी मशिनरीचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत अलाहबाद न्यायालयामध्ये इंदिराजींविरोधात याचिका दाखल केली. तेव्हा लोकांना राजनारायण यांनी हा निर्णय का घेतला होता ते लक्षात आले. त्यांचा हा खटला ऐतिहासिक ठरला. इंदिरा गांधींची निवडणूक रद्द झाली. तसेच सहा वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली. परिणामी, इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. या आणीबाणीविरोधात नंतर सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आणि जनता पक्षाचा पर्याय उभा राहिला.