वनविभाग अधिकाऱ्यांच्या माहितीतच आढळते तफावत
पुणे – राज्यातील वनाच्छादित क्षेत्राचे प्रमाण कमी असून ते वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून शतकोटी वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. दरवर्षी शासन किती झाडे लावली, याची माहिती जाहीर करते. मात्र त्यानंतर वर्षभरात किती झाडे जगली, याची माहिती कोणत्याच विभागांकडून जाहीर केली जात नाही. त्यामुळे लावलेल्यांपैकी किती झाडे खरोखर जगवली? याची आकडेवारीच समोर येत नाही.
यंदा जिल्ह्याला 1 कोटी 42 लाख 52 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्याला 55 लाख 87 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. वृक्ष लागवडीचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. त्यानंतर वर्षभरात किती झाडे जगली. त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती मात्र दिली जात नाही. वनविभागाच्या संकेतस्थळावरदेखील ही आकडेवारी उपलब्ध नाही.
याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. प्रामुख्याने झाडे जगण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के पर्यंत असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्याचबरोबर वर्षातून दोनदा लावलेली झाडे तपासली जातात. प्रत्यक्षात मात्र याची आकडेवारी सांगितली जात नाही.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या य अयोजनेचे सर्वांनी स्वागत केले. मात्र योजना लागू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी दुष्काळ स्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झाडे जगण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात आले.
यंदाही राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे मागील वर्षी लावलेली किती झाडे जगण्याचे प्रमाणही कमीच आहे. अशी परिस्थिती असताना वृक्ष लागवडीबरोबरच झाडे किती जगली, याची आकडेवारीही समोर येणे आवश्यक आहे.