बदायूं – उत्तरप्रदेशातील भाजपच्या एक महिला उमेदवार बोगस मतदानाला प्रोत्साहन देत असल्याचे कॅमेऱ्याने टिपले. संघमित्रा मौर्य असे त्या उमेदवाराचे नाव आहे. त्या राज्याचे मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्या कन्या आहेत.
बदायूं लोकसभा मतदारसंघातून संघमित्रा निवडणूक लढवत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी बोगस मतदानाचा विषय काढला. त्या म्हणाल्या, एकही मत व्यर्थ जाता कामा नये. कुणी मतदार अनुपस्थित असेल तर त्याच्या ऐवजी बोगस मतदान करण्याचे प्रकार सगळीकडेच घडतात. खऱ्या मतदारांनाच मतदानाला नेण्याचा प्रयत्न करा. मात्र, मतदार अनुपस्थित असल्यास संधी मिळाल्याने तिचा लाभ घ्या. संधी मिळाल्यास छुप्या पद्धतीने काहीतरी करता येऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यामुळे कार्यकर्त्यामंध्ये हशा पिकला. संघमित्रा यांचे संबंधित वक्तव्य चर्चेचा आणि वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. याआधीही त्यांचे एक वक्तव्य बातमीचा विषय ठरले होते. बदायूंच्या जनतेला कुणी धाकदपटशा दाखवला तर मी गुंड बनेन, असा इशारा त्यांनी दिला होता.