नवी दिल्ली – भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने मांडलेल्या महिलांच्या मोफत मेट्रो योजनेला विरोध दर्शवला आहे. अशा योजनां मेट्रो प्रकल्पांच्या हिताच्या नाहींत. देशातील अन्यही ठिकाणच्या प्रकल्पांसाठीही अशाच योजनांची मागणी होईल आणि त्यातून मेट्रो प्रकल्प राबवणेच मुष्किल होऊन बसेल असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान दिल्ली सरकारने ई श्रीधरन यांच्या मतांचा विचार करावा अशी मागणी अन्य विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाच्या सरकारकडे केली आहे.
या संबंधात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवूनही या योजनेला विरोध दर्शवला आहे. श्रीधरन यांनी म्हटले आहे की दिल्ली सरकारला महिलांना काहीं मदतच करायची असेल तर मेट्रो प्रवासाचे पैसे त्यांनी महिलांना थेट त्यांच्या खात्यावर जमा करावेत पण त्यांना मेट्रोचे तिकीट काढणे आवश्यकच केले पाहिजे.
श्रीधरन हे दिल्ली मेट्रो कार्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. ते म्हणाले आम्ही दिल्लीत जेव्हा सन 2002 साली पहिली मेट्रो सुरू केली त्यावेळी याच्या प्रवासात कोणत्याही समाज घटकाला सवलत द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वताही तिकीटे काढूनच मेट्रोने जात होतो असेही त्यांनी नमूद केले. दिल्ली प्रदेश भाजप आणि कॉंग्रेसपक्षानेही केजरीवालांना श्रीधरन यांचा सल्ला मानण्याचे आवाहन केले आहे.