कारगिल विजय दिवसाचे 20 वे वर्ष
मुुंबई – 26 जुलै 1999 रोजी कारगील युद्धात भारताने पाकिस्ताचा पराभव करीत “ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. तब्बल 60 दिवस युद्ध करीत भारताच्या शूर जवानांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. त्यादिवसापासून प्रत्येक वर्षी हा दिवस “कारगील विजय दिवस’ म्हणुन साजरा केला जातो. यंदा या विजयी दिवसाचे 20 वे वर्षे असून त्यानिमित्ताने आपल्या प्राणाची आहूती देत कारगिल युद्धात देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या भारतीय शूरविरांच्या शौर्याच्या आठवणी जागवण्यासाठी राज्य सरकारकडून शुक्रवार 26 जुलै रोजी राज्यातील 450 चित्रपटगृहांमध्ये “उरी’ हा चित्रपट मोफत दाखवला जाणार आहे.
पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसघोरी करीत काबिज केलेले प्रदेश मिळवण्यासाठी भारतीय लष्करी जवानांनी जीवाची बाजी लावली होती. सुमारे दोन महिन्यांच्या घनघोर युद्धानंतर 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानने हार पत्करली. यामध्ये भारताचा विजय झाला. या युद्धात भारताचे तब्बल 500 हून अधिक जवान शहिद झाले तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते.
यासंदर्भात सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, वितरक तसेच पीव्हीआर चित्रपटगृहांच्या मालकांशी बोलणे केले आहे. या सर्वांनी भारतीय जवानांच्या आठवणी जागवण्यासाठी तसेच तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार शुक्रवारी, सकाळी 10 वाजता एकाच वेळी हा चित्रपट दाखवला जाणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.