मॅंचेस्टर – प्रतिस्पर्धी बॉलरच्या गोलंदाजीसमोरही भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आपल्या फलंदाजीने सर्वोत्कृष्ट खेळी केली आहे तर जसप्रीत बुमराहच्या यॉर्कर चेंडूने प्रतिस्पर्धी फलंदाजांचा घाम फोडला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये रोहित-विराट अथवा बुमराहापेक्षा अधिक भीती किवींना या भारतीय खेळाडूपासून आहे. किवींच्या ताकदीला एका झटक्यात तोडू शकतो तो म्हणजे केदार जाधव.
केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत नऊ बळी घेतले आहेत. एका संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात जाधवची सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. यादरम्यान त्याची सरासरी २९.०० होती. जाधवने किवी कर्णधार केन विलियमसन आणि टॉम लाथम यांना दोन-दोन वेळा आउट केले आहे. विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी एकांडा शिलेदार आहे. अन्य जोडीदार निराशा करीत असताना एका बाजूने धडाकेबाज खेळ करीत विजयश्री खेचून आणण्यात तो माहीर आहे.
दरम्यान, सातत्याने भक्कम पाया रचणारी भारतीय संघाची फलंदाजाची पहिली फळी न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक माऱ्यास कशी सामोरी जाते यावरच त्यांचे उपांत्य फेरीतील लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. भारताच्या संमिश्र माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज किती टिकतात याचीच उत्सुकता आजच्या सामन्याबाबत निर्माण झाली आहे. या दोन संघांमधील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. साहजिकच दोन्ही संघांसाठी येथे सत्वपरिक्षाच आहे.