नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विविध गटाबरोबर विचारविनिमय करणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सरकारने जाहीर केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय करता येईल यासाठी सीतारामन मंगळवारी देशातील शेतकऱ्यांच्या संघटनाबरोबर व शेती तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी परंपरागत शेतीबरोबरच मत्स्यव्यवसाय आणि इतर जोडधंदे कसे विकसित करता येतील याबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या मागण्या एका निवेदनाद्वारे अर्थ मंत्रालयाला याअगोदरच सादर केलेल्या आहेत.