मुंबई : राज्यात येत्या २९ एप्रिल रोजी भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, नाशिक, पालघर, या १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत.
लोकसभा निवडणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय राखीव सुरक्षा दलांच्या तुकड्यांसोबतच ५०,००० मुंबई पोलीस देखील सज्ज राहणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या दिवशीच बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागणार असल्याने रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पोलीस दलातील कर्मचारी तथा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मतदानास मुकावे लागणार आहे. यामुळे आता बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान मतदान करण्याचे आवाहन मुंबई पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले असून त्याला १६००० पोलीस कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “बंदोबस्तासाठी निवड झालेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही टपालाद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत १६ हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी टपालाद्वारे मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे इच्छुक पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज सुपूर्द केले आहेत.”