नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी भारताकडून बीआयएमएसटीईसी देशांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आहे. बीआयएमएसटीईसी ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत.
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी यादेशांचे राष्ट्राध्यक्ष एक दिवस आधीच (२९ मे) भारतात दाखल होणार आहे. तसेच, या सोहळ्यासाठी किर्गिस्तानचे राष्ट्रपती देखील ३० मे रोजी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. दरम्यान, या सोहळ्यासाठी दिल्लीतील ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान’ तळावर आता पासूनच विशेष तयारी आणि नियोजन सुरु करण्यात आले आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवण्यात आली असून, याबैठकीत दिल्ली पोलीस, परराष्ट्र मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, विमानतळ ऑपरेटर, वायुसेना आणि सीआयएसएफ यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पहिल्यांदा सत्ता मिळवली तेव्हा त्यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफही भारतात आले होते. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती.