इचलकरंजी : नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं देशावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून मी प्रचार करतोय. १९०४ साली इचलकरंजीमध्ये देशात यंत्रमाग सुरु झाला, १९७० साली आत्ताच्या नॅनोसारखी छोटा गाडी जिचं नाव मीरा होत ती इथे सुरु झाली. इतकी हरहुन्नरी माणसं ह्या राज्यात असताना आम्हाला काय मेक इन इंडिया शिकवताय? अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे. शिवाय, माझ्या प्रश्नांना तुमच्याकडे उत्तरं आहेत का? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज ठाकरे हे राज्यभर सभा घेऊन, प्रचार करत आहेत. इचलकरंजी येथे आज राज ठाकरे यांची सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरुच आहे. या सभेतूनही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची जुनी आश्वासनं आणि जुनी भाषणं दाखवत टीका केली.
राज ठाकरे यांचे भाषणातील मुद्दे –
-अटकेपार झेंडा रोवलेला हा महाराष्ट्र आहे, हे राज्य कायम प्रगतिशील आहे. माझ्या गुजरात दौऱ्यात पण मी हेच सांगितलं होतं की देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांवर आहे आणि ह्याला मराठी मातीवर संस्कारच असे झालेत.
-मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, निवडणूक आयोगाला विचारत आहेत कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे आमच्या खात्यात. त्या पेक्षा मी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या
-मी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतोय त्याचा एक फायदा लक्षात घ्या की ह्या पुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही तुम्हाला गृहीत धरणार नाही कारण ते खोटं बोलले तर अशा क्लिप्स बाहेर येणार, लोक प्रश्न विचारणार
-त्या प्रश्नांची उत्तरं भाजपकडे आहेत का? या देशाची लोकशाही धोक्यात आणली, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही पत्रकार परिषद घ्यावी लागली
– नोटबंदी करताना आरबीआयच्या गव्हर्नंरना विश्वासात नाही घेतलं, अर्थमंत्र्याला विश्वासात घेतलं नाही,मंत्रिमंडळाला विश्वासात घेतला नाही. एका माणसाला झटका आला आणि त्यांनी नोटा बंद करून टाकल्या
-सरकार नको त्या गोष्टी करायला सांगतंय, त्यामुळे आरबीआयच्या दोन गव्हर्नरने राजीनामे दिले, आजपर्यंत हे या देशाच्या इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं
-काही शे कोटी खोट्या नोटांसाठी तुम्ही अर्थव्यवस्थेतल्या १६ लाख कोटी नोटा काढून घेतल्यात. नोटबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता. नोटबंदीमुळे कोट्यवधी नोकऱ्या गेल्या, लोकं देशोधडीला लागले, इथल्या इचलकरंजीमधले यंत्रमाग कामगार देशोधडीला लागले
-पंतप्रधान नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, नमामि गंगे बद्दल का बोलत नाहीयेत? जवानांच्या नावावर मतं का मागताय?
-देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख रुपये जमा करेन असं पंतप्रधान म्हणाले होते, काय झालं ह्या आश्वासनाच?
-देशातबाहेरचा काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू, गरज पडली तर कायदे बदलू, आणि कसंही करून देशात काळा पैसा आणू, आणि नोकरदारांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी त्यातला काही भाग देऊ, असं मोदी म्हणाले होते आणि अमित शाह सत्तेत आल्यावर म्हणाले हा तर चुनावी जुमला होता
-बेरोजगार तरुण नोकरीचं शोधात फिरतोय आणि हे येणार तुम्हाला स्वप्न दाखवणार, आणि पुन्हा तुमच्या पदरी पुन्हा निराशा. किती काळ चालू राहणार आहे हे सगळं ?
-गंगेच्या स्वच्छतेसाठी २० हजार कोटी खर्च केले ना, मग कुठे झाली स्वच्छ गंगा? कुठे गेले २० हजार कोटी रुपये?
-नरेंद्र मोदी हे ह्या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत जे माध्यमांना एकदाही सामोरे गेले नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत
-बालाकोटच्या ऐअरस्ट्राईक मध्ये आम्ही २५० माणसं मारली, असं अमित शाह म्हणाले.. अमित शाह गेले होते का को-पायलट म्हणून? जो मदरसा उध्वस्त केला असा दावा ह्यांनी केला, तो मदरसा अजून आहे तसा आहे हे माध्यमांनी दाखवलंय
-पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवे.. शत्रूराष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतोय? काय कटकारस्थान आहे ह्या मागे?
-सैनिकापेक्षा व्यापारी हा जास्त शूर असतो असं पंतप्रधान म्हणाले..ह्या वाक्यातून ह्यांच्या मनात सैनिकांबद्दल काय भावना आहेत हे कळतं..
-सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बँक ह्या सारख्या स्वायत्त संस्थाना हात घालून ह्यांनी लोकशाही धोक्यात आणली. हेच १९३० ला जर्मनीत हिटलर करत होता. प्रचारासाठी हिटलर फिल्म काढायचे आणि नेमकं हेच मोदी आज करत आहेत.
-बेसावध राहू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की २०१४ ला झालं ते झालं. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जाऊया. ह्या देशातील राजकीय क्षितिजावरून मोदी आणि शाह ह्यांना आपल्याला हटवायचं आहे म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे.