ना. चंद्रकांतदादा पाटील : म्हसवड येथील चारा छावणीला भेट
म्हसवड – माणदेशी फौंडेशनने चालवलेल्या जनावरांच्या चारा छावणीसाठी लागेल ती मदत सरकारतर्फे दिली जाईल. ही चारा छावणी लवकरच सरकारी योजनेत समाविष्ट करून छावणीतील जनावरांना मुबलक चारा व पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही महसुल व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. माणदेशी फौंडेशनच्या चारा छावणीला ना. चंद्रकांतदादा यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, श्रीमता चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, माणदेशी फौंडेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. रेखा कुलकर्णी, रवींद्र विरकर, बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर उपस्थित होते. यावेळी महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, या दुष्काळी भागात पाच महिन्यांपासून माणदेशी फौंडेशनने सुरू केलेली दहा हजार जनावरांची चारा छावणी बंद होणार असल्याचे समजल्यानंतर मी श्रीमती चेतना सिन्हा यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली व छावणी बंद करू नका, लवकरच छावणीला भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आज भेट दिल्यानंतर चेतनाताई यांनी चारा छावणी उत्कृष्ट पध्दतीने चालवल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी पाऊसच कमी पडल्याने सरकारने 151 तालुक्यातील 28 हजार गावांत दुष्काळ जाहीर केला. सरकारने अचानक नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनच या उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेतली होती.
67 लाख नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार पाचशे कोटी जमा झाले आहेत. सद्या शासनामार्फत आपण दुष्काळी भागातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या असून या चारा छावणीसाठी विविध संस्थांनी छावण्या सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्या महाराष्ट्राच्या उपसमितीची बैठक होत आहे. त्यात आपण छावण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना कशा राबवता येतील, यावर चर्चा करणार आहोत. सद्या महाराष्ट्रात पाच हजार पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. मागेल त्याला पाण्याचे टॅंकर देण्याची आपण व्यवस्था केली आहे.
चाऱ्याची समस्या भेडसावत असल्यामुळे सरकारतर्फे 1 लाख एकरावर चारा लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देतो आहोत. दुष्काळी भागात गेल्या पाच महिन्यापासून माणदेशी फौंडेशनने चालवलेल्या छावणीसाठी लागेल ती मदत सरकार तर्फे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी चेतना सिन्हा यांनी म्हणाल्या, पाच महिने झाले, छावणी चालवतोय. आज दहा हजारच्या आसपास जनावरे आहेत. त्यांना साडे चार लाख लिटर पाण्याची दररोज गरज आहे.