खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
सेंद्रीय शेतीकडे लक्ष द्या-देवकाते
राजगुरूनगर – सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. यंदाचा दुष्काळ समोर ठेवून पुढील वर्षीचे पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले. खरीप हंगाम बैठक दरवर्षी मे महिन्यात होत असते यावर्षी तब्बल दोन महिन्यांनी खरीप हंगाम बैठक घेतल्याने या बैठीकीला बळीराजाने पाठ फिरवली. दरम्यान, “खरीप हंगाम आढाव्याची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली दैनिक “प्रभात’मध्ये 19 जून 2019 रोजी वार्तापत्र प्रसिद्ध झाले होते. त्याचीच दखल घेत ही बैठक घेण्याचे आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती सभागृहात खेड तालुका खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.16) झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंह मित्रगोत्री, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, बाबाजी काळे, तनुजा घनवट, दिपाली काळे, रुपाली कड, निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, मंच्छीद्र गावडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मादंळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. व्ही. कोहीणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विभागीय अधिकारी व्ही. व्ही. भास्कर आदिसह ग्रामसेवक,कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुका खरीप आढावा गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मादंळे यांनी सादर केला. जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंह मित्रगोत्री यांनी मार्गदर्शन केले.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरले भरुनही मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले. अनेक जण वंचित राहिले आहेत. जिल्हा परीषदेकडून येणाऱ्या योजनांचे अर्ज सादर करुनही लाभ मिळत नाही, त्याऐवजी हाच अर्ज पुढे ग्राह्य धरला तर शेतकरी, लाभार्थ्यांना दरवर्षी अर्ज करण्याचा आटापिटा धावपळ थांबुन होणारी अर्थिक पिळवणूक थांबेल. जिल्हा परीषदेमार्फत विविध योजनासाठी लाभार्थीनी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले असले तरी यंदाच्या तरतुदीनुसार सर्वांनाच त्याचा लाभ देत नसला तरी दरवर्षी वंचित लाभार्थी फेर अर्ज करण्याऐवजी हेच प्रकरण पुढील वेळच्या लाभार्थी म्हणून ग्राह्य धरले तर शेतकरी लाभार्थींचा वेळ आणि अर्थिक झळ बसणार नाही यासाठी पुढाकार जिल्हा परिषदेने घेवी. काही लाभार्थी एकाच वेळी अनेक विविध विभागात लाभ मिळण्यासाठी वेगवेगळे अर्ज सादर करीत असले तर एकाच वेळी एकच लाभ, असे धोरण राबण्यासाठी संगणक ऍप तयार करुन कामकाज केले तर अनेक लाभार्थी लाभापासुन वंचित राहणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीचे नियोजन पंचायत समितीमधील मंडलाधिकारी नरेंद्र वेताळ, एस. एन. मुल्ला, बाळासाहेब ओव्हाळ, बी. व्ही.ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जीवन कोकणे, तर उपसभापती भगवान पोखरकर यांनी आभार मानले.
10 पंचायत समिती सदस्यांची दांडी
जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीचा अधिकारी आणि पदाधिकारी यांनी केवळ फार्स केल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. या बैठकीला बोटावर मोजण्याएवढे शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्यांसह 14 तब्बल 10 पंचायत समिती सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे विहित नमुन्यात अर्जाचे सादरीकरण केले. मात्र, महसूल विभागाकडून वेळेत ऑनलाईनचे काम झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी नॅशनल बॅंकाचे खाते नंबर दिले त्यांच्या खात्यात पैसे आले. अनेक शेतकरी सोसायट्यांचे सभासद आहे. बहुतेक शेतकऱ्यांची बॅंक खाती सहकारी बॅंकेत असल्यामुळे या बॅंकांच्या शेतकरी खात्यात पैसे आले नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सहकार क्षेत्रात काही जण सोसायट्यामार्फत शेतकरी सभासदांच्या नावे परस्पर पीक कर्जे काढुन वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अनेक शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्जे उचलण्यात आली आहेत, याची चौकशी करावी.
– शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य