नवी दिल्ली – सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा तसेच महेंद्रसिंह धोनीचा अनुभव यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारत विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असा विश्वास भारताच्या एकदिवसीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना मिताली म्हणाली की, भारताकडे एकहाती सामना जिंकून देणारे अनेक खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू भारताला कोणत्याही परिस्थितीत आघाडी मिळवून देऊ शकतात. जो संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारेल आणि त्यांचे गोलंदाज हे आव्हान प्रतिस्पर्ध्याला गाठू देणार नाहीत, तोच संघ विजेता होईल. गोलंदाजी आणि फलंदाजीत भारताकडे सक्षम खेळाडू आहेत, त्यातच यंदा आक्रमक गोलंदाज भारतीय संघात असल्याने भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेचा प्रमुख दावेदार आहे.