प्रहार जनशक्तीचे शंभुराज खलाटे यांचा साखर आयुक्तांना इशारा
सातारा – मागील गळीत हंगामातील थकीत देणी शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत अदा करा, अन्यथा साखर आयुक्त कार्यालयात पूर्वसूचना न देता आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख शंभुराज खलाटे यांनी दिला आहे.
सन 2018-19 गळित हंगाममधील राज्यातील कारखानदारांकडून 31 मे 2019 अखेरीस 1500 कोटी व सोलापूर आणि सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे 600 कोटी रुपये एफ.आर.पी. ची रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. वास्तविक ऊस गेल्यानंतर 14 दिवसांत एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असताना आणि गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुद्धा एफआरपीच्या रकमेपैकी 1500 कोटी रुपये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. एफआरपीची पूर्ण रक्कम मिळण्याकरिता यापूर्वी 4 मे 2019 रोजी निवेदन दिले.
त्यानंतरही कारखानदारांकडून शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळालेली नाही. यासह लेखापरीक्षकांनी माहिती मंजूर अथवा नामंजूर कधी केली, याची सर्व माहिती त्या कारखान्याच्या सभासदांसाठी अथवा ऊस उत्पादकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम मिळण्यासाठी शासनाने कारखान्यास कोणत्या दिवशी नोटीस पाठविली व त्या नोटिशीस कारखान्याकडून कोणते उत्तर मिळाले ही माहिती शेतकऱ्यांना ऑनलाइन उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याकडून योग्य त्या उपाय योजना व्हाव्यात.
ऊस बिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी यासाठी ऍप तयार केला आहे, त्याच्या त्रुटी दूर करून आठ दिवसांत तो ऍप चालू करू अशी माहिती आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून दिली होती तो ऍप तातडीने चालू व्हावा. तरी वरील सर्व मागण्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमदार बच्चूभाऊ कडू याच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन पूर्वसूचना न देता आठ दिवसानंतर साखर आयुक्त कार्यालयात करण्यात येईल, असा इशारा खलाटे यांनी दिला आहे.