अमरावती: आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच वेगवेळ्या मागास जातींना प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने पाच उपमुख्यमंत्री नेमले आहेत. येत्या शनिवारी या पाच उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. जगन यांच्या मंत्रिमंडळात एकूण 25 मंत्री आहेत.
जगनमोहन यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावली. त्यात त्यांनी ही घोषणा केली. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अदिवासी, अल्पसंख्याक आणि कपु जमातीचा प्रत्येकी एक या प्रमाणे हे पाच उपमुख्यमंत्री नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळात रेड्डी समाजाला मोठे प्रतिनिधीत्व मिळेल असे वाटले होते. पण मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या मंत्रिमंडळात उपेक्षित जातींना पुरेसे प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. सरकारच्या मध्याला म्हणजे अडीच वर्षांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल असेही त्यांनी सांगितले. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री होते. तथापी जगनमोहन यांनी आपल्या सरकारकडे पुरेसे बहुमत असतानाही पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा केल्याने त्याविषयी आश्चर्य व्यक्त केल जात आहे.