हैदराबाद: तेलंगणातील कॉंग्रेस पक्षाच्या अठरापैकी बारा आमदारांनी पक्षांतर करून सत्तारूढ टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशाला पक्षांतर बंदी कायद्यातील विलिनीकरणाच्या कलमाअंतर्गत सभापतींनी मान्यता दिली आहे. ही पक्षातील फूट मानली गेल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या विकास कार्यामुळे तसेच कल्याणकारी राज्यपद्धतीमुळे प्रभावीत होऊन या आमदारांनी तेथे पक्षांतर केले आहे असा दावा टीआरएस पक्षाकडून केला जात असला तरी प्रदेश कॉंग्रेसने मात्र आमच्या आमदारांना धमकाऊन, ब्लॅक मेलिंग करून तसेच पैशाचे अमिष दाखवून फोडले जात असल्याचा आरोप केला आहे.
प्रदेशाध्यक्ष एन उत्तमकुमार रेड्डी म्हणाले की कॉंग्रेस पक्ष आपले स्वताचे आमदार एकत्र ठेऊ शकत नाही असे वातावरण जनतेत निर्माण करण्यासाठी सत्तारूढ टीआरएस पक्षाने ही कृती केली आहे. त्यासाठी त्यांनी आमच्या आमदारांना कोट्यवधी रूपयांचे अमिष दाखवले आहे. जे आमदार या अमिषाला भुलले नाहींत त्यांना धमकावले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापी कॉंग्रेसचा हा आरोप टीआरएस पक्षाने फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की हे आमदार काही शाळकरी विद्यार्थी नाहींत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाने प्रभावीत होऊन हा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस आता केवळ तेलंगणातच नव्हे तर पुर्ण देशात अस्तित्व हीन झाली आहे असा आरोपही त्यांनी केला.