पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील मारुती दगडु बढेकर या शेतकऱ्याने आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अर्धा एकर क्षेत्रातील 12 महिन्यांचा ऊस जनावरांना चाऱ्यासाठी मोफत उपलब्ध करुन देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यात दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार होऊ लागली आहे. जारकरवाडीतील बढेकरवस्ती परिसर डिंभा उजवा कालव्यामुळे बाराही महिने हिरवा गार असतो. जनावरांनाही मुबलक प्रमाणात हिरवा चारा मिळत असतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून राजस्थानमधील अनेक गोपालक आपल्या गायींचा कळप घेऊन या परिसरात वास्तव्यास आहेत, परंतु यावर्षी दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. चाऱ्या अभावी गायींची उपासमार होत असल्यामुळे मारुती बढेकर यांनी अर्धा एकर क्षेत्रातील ऊस या गायींना चरण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिला आहे.