दहावीचा निकाल : यंदा फक्त गणित आणि विज्ञानालाच मिळाले 20 गुण
पिंपरी – मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कॉपीमुक्त अभियान राबवून देखील दहावीच्या निकालाचा आलेख चढत्या क्रमानेच वाटचाल करत होता. परंतु, यावर्षी परीक्षा मंडळाने भाषा विषयाचे मुख्याध्यापकांच्या अधिकारातील 20 गुणांना कात्री लावली व पहिल्यांदाच प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलल्यामुळे निकालाचा टक्का घसरला. तीन ते चार वर्षानंतर पिंपरी-चिंचवड शहराचा निकालाचा आलेख प्रथमच बदलला आहे.
दहावीच्या परीक्षेत चार वर्षापूर्वी परीक्षा मंडळाने बदल करत विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषा विषयासोबतच विज्ञान व गणित या विषयांसाठी तोंडी परीक्षा ठेवली होती. यासाठी 20 गुण निश्चित केले होते. हे गुण मुख्याध्यापकांच्या अधिकारात देण्यात येत होते.
शाळा देत होत्या सढळ हाताने गुण
बहुतांश शाळा सढळ हाताने विद्यार्थ्यांना 15 ते 20 गुण देत होत्या. तसेच बोर्डाकडूनही ग्रेस गुण दिले जातात. त्यामुळे, संबधित विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये उत्तीर्ण हेण्यासाठी अवघ्या पाच ते दहा मार्कांची गरज भासत असे. परिणामी विद्यार्थ्यांसोबतच शाळांच्या निकालाचा टक्का उंचावत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने भाषा विषयांचे म्हणजेच हिंदी, मराठी, आणि इंग्रजीचे तोंडी परीक्षेचे गुण देणे बंद केले. यावर्षी केवळ गणित आणि विज्ञान या विषयांसाठीच हे गुण देण्यात आले. या मोठ्या बदलांचा थैट परिणाम दहावीच्या निकालावर दिसून आला आणि पास होण्याची टक्केवारी अचानक खाली घसरली.
कृती पत्रिकांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम
यासोबतच यावर्षी पहिल्यांदाच दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही बदलण्यात आले होते. पहिल्यांदाच कृती पत्रिका उपयोगात आणल्या गेल्या. या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप विद्यार्थ्याच्या लक्षात यावे, त्यांना त्या अनुषंगाने अभ्यास करता यावा यासाठी शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळेला संबंधित विषयाच्या दहा-दहा कृती पत्रिका पुरविल्या होत्या. या कृतीपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवूण घेणे अपेक्षित होते. शहरातील नामांकित शाळांनी यावरच भर दिला व विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त कृती पत्रिका सोडवून घेतल्या. मात्र महापालिकेच्या शाळा व इतर शाळांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्यांदा शहराचा निकालाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. एकही अर्ज परवानगीसाठी आला नसल्याची माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.