सुमारे 40 वर्षांत 224 सुरक्षा जवान शहीद, 571 नागरिकांचा मृत्यू
मुंबई –महाराष्ट्रात 1980 पासून सुरक्षा दलांनी 246 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. संबंधित कालावधीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये 224 सुरक्षा जवान शहीद झाले. तर, 571 नागरिक मृत्युमुखी पडले.
नक्षलवाद्यांनी 1 मे यादिवशी गडचिरोली जिल्ह्यात आयईडीचा स्फोट घडवला. त्या स्फोटाचे लक्ष्य शीघ्र कृती दलाचे वाहन ठरले. त्या घटनेत दलाचे 16 जवान शहीद झाले. त्या घटनेमुळे महाराष्ट्रातील नक्षली कारवायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
त्यापार्श्वभूमीवर, सरकारी सुत्रांनी सुमारे 40 वर्षांत राज्यात घडलेल्या नक्षली हिंसाचाराशी संबंधित आकडेवारी दिली. राज्यात 2014 नंतर नक्षलवाद्यांना मोठा तडाखा बसला. त्या वर्षापासून आतापर्यंत 98 नक्षलवादी मारले गेले. तर त्या वर्षापासून आतापर्यंत पोलीस दलाचे 19 जवान शहीद झाले. सुरक्षा दलांच्या दृष्टीने 2018 हे वर्ष विशेष ठरले. त्या वर्षी सुरक्षा दलांशी संबंधित कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याउलट, त्या वर्षी तब्बल 50 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील तीन जिल्हे नक्षलग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया हे ते जिल्हे आहेत.