नगर: गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. या पावसाअभावी मागील वर्षीचा खरीप व रब्बी हंगामही वाया गेला. परिणामी गावगाड्याचे नियोजनच कोलमडले आहे. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारे सालगड्याचे करारही झाले नाहीत. मागील वीस वर्षांतील ही भयावह परिस्थिती असल्याचे जाणकार लोक सांगत आहेत.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शेतकरी हे सालगड्यासोबत नव्याने तोंडी व एकमेकांच्या विश्वासावर वार्षिक करार करतात.
वर्षभर शेतात चांगला राबणारा, सहकुटुंब राहणारा सालगडी सर्वात जास्त भाव खाऊन जातो. अन् तोच गडी परत मिळावा म्हणून शेतकरीदेखील बोली लावून जादा दर देत कष्टाळू सालगडी आपल्याकडेच ठेवून घेत असतो. मात्र, दरवर्षी दुष्काळाचा गतिरोधक आडवा आला आहे.वाढत्या दुष्काळाने एका वर्षासाठी सालगडी ठेवणे शेतकऱ्याला आता डोईजड झाले आहे. पावसाअभावी शेतीमाल उत्पादनात प्रचंड घट झाल्याने असमतोल निर्माण झाला आहे. पैशाअभावी शेतकऱ्याची गत आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी झाली आहे. यामध्ये मोठे शेतकरी सोडले तर लहान शेतकऱ्यांनी तर यंदा दुष्काळामुळे सालगड्याचा विचारच सोडून दिलेला आहे.
खरीप हंगामामध्ये कोणती पिके घ्यायची, रब्बीत कोणती घ्यायची याचे नियोजन करणाऱ्या बळीराजाची गत गेल्या तीन-चार वर्षांपासून केविलवाणी झाली आहे. निसर्गाच्या कोपामुळे पाऊसच नाहीसा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पशुधन वाचविण्यासाठी जगाचा पोशिंदा कर्जबाजारी बनला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रापैकी अल्प पर्जन्यमानामुळे एकूण उत्पन्नापैकी फक्त 30 टक्के उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले आहे. त्यामुळे या उत्पन्नावर शेतकरी व सालगड्याचा उदरनिर्वाह भागणार कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
खरीप व रब्बी हंगाम गेला वाया
खरीपातील उडीद, मूग, तीळ, मटकी, सूर्यफूल तर रब्बीतील हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी ही सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहेत. ज्या पिकांकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहतो, तीच पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांतील शेती उत्पन्नाची स्थिती पाहता त्यांच्या पगाराएवढेही उत्पन्न निघत नाही.अशा परिस्थितीत सालगड्याचा पगार कसा द्यायचा? या चिंतेत शेतकरी आहेत.