पुणे – महापालिकेकडून भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आता उर्वरित 1 किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात येणार आहे. भामा-आसखेड ते महापालिकेपर्यंत सुमारे 48 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार असून 47 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर एक किलोमीटरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
शहराच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून सुमारे 400 कोटींची भामा आसखेड योजना राबविण्यात येत आहे. 2012 पासून या योजनेचे काम सुरू असून गेल्या सहा वर्षांत 3 ते साडेतीन वर्षे या योजनेचे काम भामा-आसखेड धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यासाठी बंद केले होते. त्यामुळे हे काम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धरणग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होई पर्यंत या योजनेच्या शेवटच्या टप्प्यातील 1 किलोमीटर जलवाहनीचे काम पूर्ण करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्याच वेळी राज्यशासनाने या धरणाबाबत महापालिकेचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करत प्रकल्पग्रस्तांना प्रतिहेक्टर 15 लाख रुपये दोन्ही महापालिकांनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना महापालिकेकडून भरपाई देण्यास सुरुवात करण्यात आली असून नुकतेच पोलीस बंदोबस्तात या पाणी योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्या नंतर आता पालिकेने जलावहीनेचे काम हाती घेण्यात येणार आहे.