मुंबई – बीसीसीआयची प्रशासक समिती भारतीय संघाच्या पराभवाची समीक्षा करणार आहे. उपान्त्य फेरीत झालेल्या पराभवाबद्दल कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या संदर्भात काही प्रश्न प्रशासकांकडून विचारण्यात येणार आहेत.
विनोद राय अध्यक्ष असलेल्या प्रशासक समितीमध्ये माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रिव थोडगे यांचा समावेश आहे. प्रशासक समिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. विनोद राय यांनी सांगितले की, कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत बैठक होणार आहे.
यावेळी होणाऱ्या बैठकीत शास्त्री, कोहली आणि एमएसके प्रसाद यांना काही प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये अंबाती रायुडूला का डावलण्यात आले. त्याचबरोबर तीन यष्टिरक्षकांची संघात निवड का करण्यात आली. विशेषत: दिनेश कार्तिक फॉर्ममध्ये नसतानादेखील त्याचा समावेश संघात का करण्यात आला आणि तिसरा प्रश्न उपांत्य फेरीत धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवण्यात आले. या व अशा आणखीन एक दोन प्रश्नांवर या तिघांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.