भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
औरंगाबाद – कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे बंड आज शमले. सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, आता त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार हे नाराज होते. मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढली तरी जिंकण्याची शक्यता फार कमी होती. याशिवाय सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी अब्दुल सत्तार यांनी अर्ज मागे घेतला आहे. अब्दुल सत्तार आता कोणाच्या पाठीमागे उभे राहणार, कॉंग्रेसला मदत करणार की नाही? यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत कॉंग्रेसवर नाराज अब्दुल सत्तार यांनी दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली. मात्र या जागेसाठी आधीच कुणालातरी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अशी माहिती समोर आली होती.