माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा
लासुर्णें- लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले. मित्र पक्षानेही येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा धर्म पाळून आमचे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मित्रपक्षाने आघाडीचा धर्म पाळला नाही तर जनता हाच आमचा पक्ष असून जनता ठरवेल तो पक्ष ठरवू, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील सुमारे 50 गावांना भेटी देत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस इंदापुरमध्ये जाहीर मेळावा घेवून विधानसभेची भूमिका स्पष्ठ करणार आहेत. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे गावभेट वेळी पाटील बोलत होते. पाटील यांनी सांगितले की, तालुक्याचे शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विधानसभेची येणारी निवडणूक ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रपंचाशी निगडीत आहे. तालुक्याला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज आहे.
मित्रपक्षाने आघाडी धर्म पाळला नाही तर, जनता ठरवेल त्या पक्षातुन निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, उपसभापती देवराज जाधव, बाळासाहेब डोंबाळे, ज्ञानदेव बोंद्रे, वसंत मोहोळकर, मोहन दुधाळ, आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, सत्यशिल पाटील, विक्रम मोरे, दयानंद झेंडे, कुमार गायकवाड, मधूकर कदम, संतोष कदम आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या सादिया शेखचा सत्कार करण्यात आला.