सव्वा लाखाच्या ऐवजासह दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सातारा, दि.16 (प्रतिनिधी) –
पवारवाडी (ता. फलटण) येथील एका पेट्रोलपंपावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यावेळी अटकेतील दोघांच्याकडून पोलिसांनी एक लाख 27 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. महेश जयराम जगदाळे (रा.काबंळेश्वर, ता. बारामती) प्रवीण उर्फ गोट्या संजय करनोर (रा. मठाचीवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी तीन तर सोलापूर जिल्ह्यात एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे हे सहकाऱ्यांसमवेत फलटण तालुक्यातील रात्रगस्त घालत होते. त्यावेळी दोन तरूण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार गवसणे हे जिंती नाका परिसरात गस्त सापळा लावून थांबले होते. दरम्यान माहितीतील वर्णनाप्रमाणे दोन तरूण नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आल्याने त्यांना पोलिसांनी थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेतले.
या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पवारवाडी (ता. फलटण) येथील पेट्रोल पंपवार दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे अकरा मोबाईल, 33 मोबाईल सिम कार्ड, 10 मेमरी कार्ड, एक दुचाकी, रोख रक्कम असा एक लाख 27 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संशयितांनी त्यांच्याकडील अकरा मोबाईल हे महामर्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून चोरल्याचीही कबुली दिली आहे. अटकेतील संशयितांनी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जबरी चोऱ्या व दरोडा टाकल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, हवालदार उत्तम दबडे, विनोद गायकवाड, पो.ना. मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रविण कडव , गणेश कापरे, धीरज महाडीक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी केली.