राजीव गांधींनी युद्धनौकेचा वापर खासगी सफरीसाठी केल्याचा आरोप
मात्र, एका निवृत्त अधिकाऱ्याला आरोप मान्य
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खासगी सफरीसाठी केल्याचा आरोप नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, तो आरोप नौदलाच्या काही माजी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. त्यात माजी नौदलप्रमुख एल.रामदास यांचाही समावेश आहे.
राजीव गांधींनी आयएसएस विराटचा वापर प्रायव्हेट टॅक्सीसारखा केला. त्यांच्या समवेत त्यांच्या सासरचे लोकही होते, असा दावा मोदींनी केला होता. राजीव गांधींनी युद्धनौकेवरून केलेली सफर सरकारी होती. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सोनिया गांधी याही होत्या. मात्र, त्यांच्या समवेत कुणी परदेशी नागरिक किंवा इतर पाहुणे नव्हते. त्या सफरीवेळी सर्व सरकारी शिष्टाचारांचे पालन करण्यात आले, अशा आशयाची भूमिका रामदास यांच्याबरोबरच निवृत्त व्हाईस ऍडमिरल विनोद पसरीचा आणि निवृत्त व्हाईस ऍडमिरल आय.सी.राव यांनी मांडली.
राजीव गांधी यांच्या त्या सफरीवेळी आयएनएस विराटच्या संचालनाचे नेतृत्व पसरीचा यांच्याकडे होते. दरम्यान, नौदलाचे आणखी एक निवृत्त अधिकारी व्ही.के.जेटली यांनी मात्र राजीव गांधी यांनी सुटीसाठी युद्धनौकेचा वापर केल्याच्या आरोपाला दुजोरा दिला. त्या घटनेचा मी साक्षीदार होतो, असे त्यांनी म्हटले आहे.