केळघर -ग्रामीण भागातील सर्वाधिक बाधित आढळलेले पुनवडी हे गाव आहे. येथील संसर्ग कमी होण्यासाठी प्रशासन दक्ष असून त्यासाठीच सर्व ग्रामस्थांच्या घशातील स्रावांचे नमुने घेतले आहेत. येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
पुनवडी येथील बधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गावात पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, संदीप ढाकणे, डी. एम. यादव उपस्थित होते. डॉ. कवारे यांच्याकडून सिंह यांनी माहिती घेतली.
पुनवडीची लोकसंख्या खूप कमी असली तरी येथील बधितांचा आकडा वाढला आहे. येथील साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने ग्रामस्थांना शेतीच्या कामासाठी बाहेर पडता येत नाही.
त्यामुळे भात शेती पडून राहण्याची भीती आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे यांनी केली असता, प्रतिबंधित क्षेत्र असल्याने कुणालाही घराबाहेर पडता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.