आताचा हिंदी सिनेमा खूप बदलतोय. तो खूप सूक्ष्म होतो आहे. “गली बॉय’ही तसाच होता. आता तर तो ऑस्करसाठी निवडला गेला आहे. पण, इतरही अनेक चित्रपट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहेत.
त्यामुळे आम्ही तयारी करत आहोतच. तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करा. मला वाटतं यंदा आपण ऑस्कर घेऊन येऊ, अशा शब्दांत दिग्दर्शक झोया अख्तर यांनी भारतीय चित्रपट आणि “गली बॉय’ला ऑस्कर मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केला.
जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये “मामि’ महोत्सवाची पत्रकार परिषद झाली. यावेळी झोया अख्तर, विशाल भारद्वाज, अनुपमा चोप्रा, रोहन सिप्पी, आदित्य रॉय कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. पण सगळ्यांच्या नजरा होत्या त्या झोयावर. झोयाने महोत्सवाची माहीती दिलीच, पण तिनेच “गली बॉय’च्या निवडीबद्दलही आपली मतं मांडली.
‘मामि’सारखा महोत्सव मुंबईत भरतोय ही खूप महत्वाची घटना आहे. त्यानिमित्ताने जगभरातील चित्रपट आपणास पाहण्याची संधी उपलब्ध होते. या महोत्सवातून जगात होत असलेल्या घडामोडींसह तेथील जनजीवन, राहणीमान आणि तंत्रज्ञान यांचीही माहिती मिळते. मीही वेळात वेळ काढून हे चित्रपट पाहणार आहे, असेही झोयाने आवर्जून सांगितले.