पुणे – जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा नाही, त्यामुळे या वंचित विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी आता “शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक स्वत: गृहभेटी देऊन किंवा ओसरी, मंदिर, चावडी, मैदानावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.
करोनामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. 15 जूनपासून 2020-21चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतु, ग्रामीण भागासह संपूर्ण राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
एकीकडे आरोग्याचा धोका तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तर भविष्यात शाळा सुरू झाल्यावर अभ्याक्रम पूर्ण करताना शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन शिक्षण सुरू केले.
यासाठी शिक्षकांना शाळेत येण्यास सांगण्यात आले. परंतु, अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. तर दुर्गम आणि डोंगरी भागात नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेने “शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.