रमेश जाधव
रांजणी – टोमॅटोचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते याहीवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे मुख्य पीक घेतले आहे; परंतु सद्यःस्थितीत टोमॅटोवर जिवाणूजन्य करपा रोग आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोवरील मर रोगाने शेतकरी आधीच ग्रासला होता. महागडी औषधे फवारून देखील हा रोग आटोक्यात येत नव्हता. आता त्यातच जिवाणूजन्य करपा टोमॅटोवर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत.
- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या चार तालुक्यात मुख्यत्वेकरून हजारो हेक्टर क्षेत्रात टोमॅटोचे पीक घेतले जाते. खराब वातावरणामुळे सध्या टोमॅटोचे पीक कीड आणि रोगांचे विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावातील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटो पिकाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. यावर्षी करोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक लागवडीला काहीअंशी प्राधान्य दिले नसले तरी ज्या शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक जगवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत; परंतु सद्यःस्थितीत टोमॅटोची रोपे रोगांमुळे मोडून पुन्हा लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आणि त्यानंतर आता या पिकावर जिवाणूजन्य करपा रोगाने घाला घातल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. लागवडीपैकी सुमारे 40 ते 50 टक्क्यांपर्यंत करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
आंबेगाव तालुक्यात सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले जातेण एक एकर क्षेत्रातून 2000 क्रेट टोमॅटो पीक येते. मात्र, सध्या करपा रोगामुळे हे प्रमाण घटले असून, 400 ते 500 क्रेट इतकेच पीक शेतकऱ्यांना मिळत आहे.आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या फळांवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला असल्याचे दिसून येत असून, जिवाणूजन्य करपा रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
– डॉ. गजेंद्र जगताप, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, औरंगाबाद
या रोगाचा प्रादुर्भाव पानावर आणि फांद्यांवर झाल्यामुळे प्रकाश विश्लेषणाची प्रक्रिया मंदावते अन्ननिर्मिती होत नाही परिणामी बाजारभाव कमी मिळतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची केलेली लागवड आर्थिक दृष्ट्या तोट्याची ठरू पाहत आहे. आधी मर रोगामुळे टोमॅटोचे नुकसान होऊन टोमॅटोचा बागा मोडाव्या लागल्या तर आता जिवाणूजन्य करपा सतावत आहे.
– अनिल नेहरकर, टोमॅटो उत्पादक शेतकरी, येडगाव (ता. आंबेगाव)