नवी दिल्ली -आंध्र प्रदेशातील सत्तारूढ वायएसआर कॉंग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसममधील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातून तेलगू देसमची मान्यताच रद्द करण्याची मागणी वायएसआर कॉंग्रेसने केली आहे.
वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची भेट घेतली. त्या भेटीत तेलगू देसमची मान्यता रद्द करण्याचे साकडे घालण्यात आले.
आंध्रचा संबंध अंमली पदार्थांशी जोडून तेलगू देसम राज्याची बदनामी करत आहे. खोट्या प्रचारतंत्राचा वापर करून तो पक्ष जनतेचे मन कलुषित करत आहे. मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी आणि सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. सार्वजनिक जीवनात सभ्यता, शिष्टाचाराचे पालन होणे गरजेचे आहे.
त्याशिवाय, लोकशाही मुल्यांचे जतनही व्हायला हवे. त्यामुळे एक उदाहरण घालून देण्यासाठी तेलगू देसमवर कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे निवेदन त्या शिष्टमंडळाने चंद्रा यांच्याकडे सादर केले.