मुंबई – चीनमध्ये विकासकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेतल्यामुळे तेथे रिऍल्टी क्षेत्रात प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र भारतामध्ये सुदैवाने रिऍल्टी क्षेत्रात बुडबुडा (बबल) निर्माण झालेला नाही. भारतातील विकसकांनी कर्ज घेऊन घरे विकसित करण्याच्या मॉडेलवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. सध्या भारतातील परिस्थिती रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सर्वोत्तम आहे, असे ज्येष्ठ बॅंकर दीपक पारेख यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, घरांचा पुरवठा व किंमत या आघाड्यावर भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राची परिस्थिती सध्या सुवर्णमध्य साधणारी आहे. माझ्या 50 वर्षाच्या अनुभवांमध्ये रिऍल्टी क्षेत्रासाठी इतकी पोषक परिस्थिती कधीच नव्हती. घरे कमालीच्या किफायतशीर किमतीत मिळत आहेत. व्याजदर अतिशय कमी पातळीवर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांच्या घरा मनात घरे विकत घेण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे.
आगामी काळातही हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे विकासकांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे. भारतातील घर निर्मितीचा आढावा घेतल्यानंतर दर सहा ते सात वर्षांनी या क्षेत्रात तजीची परिस्थिती निर्माण होत असते. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती 2012-13 मध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर घरे महाग होत गेली आणि भांडवल सुलभता कमी झाली. त्यामुळे विकसकांना जाहीर केलेल्या प्रकल्पाची पूर्तता करण्यात अडचणी आल्या.
केंद्र सरकारने किफायतशीर घरांना अनुदान योजना देण्याची योजना सुरू केली आहे. ती अतिशय चांगली असून या योजनेला मुदतवाढ देण्याची किंवा या योजनेत सुधारणा करून तिची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी विकसकांनी घरांच्या किमती आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवू नयेत. चांगली परिस्थिती ही दुधारी तलवार असते. या परिस्थितीचा योग्य प्रकारे वापर करण्याची गरज असते. अन्यथा त्यामुळे आपलेच नुकसान होऊ शकते असे पारेख म्हणाले.
चीन पासून धडा घ्यावा
जास्तीत जास्त कर्ज घेऊन प्रकल्प विकसित करण्याचे चीनचे मॉडेल अयशस्वी झाले आहे. त्यापासून भारतीय विकासकांनी धडा घ्यावा. चांगली परिस्थिती असल्यास कर्ज घेतल्याने नफा वाढतो. मात्र परिस्थिती बिघडल्यास तोटाही तितकाच होतो. चीनमधील बलाढ्य विकासक कंपनी एव्हाग्रॅंडवर 305 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर 2008 सारखी परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. असाच प्रकार 2008 मध्ये अमेरिकेमध्ये घडला होता असे पारीख म्हणाले.