सातारा -मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मात्र, त्याच्या भावनातिरेकातून युवकांनी टोकाचे आत्महत्येचे पाऊल उचलू नये, संयम बाळगावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक खंडपीठाकडे वर्ग केल्याने बीड जिल्हयातील युवकाने आत्महत्या केली. त्याच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणतात, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चा, विद्यार्थी परिषदा होत आहेत. युवकांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. खासदार उदयनराजे ट्विटमध्येबीडमधील युवकाला श्रद्धांजली वाहिली. बीड जिल्ह्यातील तरुण विवेक कल्याण राहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली.
त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत, असे उदयनराजे यांनी नमूद केले आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आपला होईल, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.