सूर्यकांत पाटणकर
पाटण -तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मोरणा विभागातील मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्प सध्या मुबलक पाणी साठल्याने तुडुंब भरला आहे. या धरणातील पाणी कालव्याअभावी नदीपात्रात सोडून द्यावे लागत आहे. या धरणातून डावा आणि उजवा कालवा खोदण्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, लघुपाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे या कालव्यांची कामे रखडली आहेत.
मोरणा – गुरेघर मध्यम प्रकल्पात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना लघुपाटबंधारे विभागाच्या निष्क्रिय धोरणामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू असणारी कालव्यांची कामे ठप्प असल्याने या धरणातील पाणी विनावापर नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोरणा गुरेघर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. कालव्यासाठी लागणारी जमीन संपादनातील अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जमिनी देणारे शेतकरी आणि शासकीय अधिकारी व प्रशासन यांच्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार व भूसंपादनातील प्रक्रिया यामधील समन्वय होत नसल्यामुळे यावर्षी सुरू होणारी कालव्यांची कामे अद्याप ठप्प आहेत.
मोरणा गुरेघर प्रकल्पाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, लघुपाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे अजून कालव्यांच्या कामाला किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही शेतीला पाणी मिळत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत.
पाटण तालुक्यात सहा मध्यम प्रकल्प आहेत. त्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मात्र, त्या पाणीसाठ्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला किंवा पिण्याच्या पाण्यासाठी आजपर्यंत होत नसल्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. याकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांमधून होत आहे.
मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाच्या कामाला 1996 साली सुरुवात झाली. तेंव्हापासून आजअखेर या प्रकल्पापासून मिळणाऱ्या लाभाची आजही शेतकऱ्यांना किंवा जनतेला प्रतिक्षा करावी लागत आहे. निघून गेलेल्या कालखंडाचा विचार करता शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोरणा-गुरेघर प्रकल्पात सुमारे दीड टीएमसी पाणी साठवले जाते. परंतु, प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अद्याप ठप्प असल्याने कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा होत नाही. पर्यायाने शेतीचे प्रचंड नुकसान यामुळे होते. त्यामुळे मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यासाठी गुरेघर प्रकल्पापासून गोकुळ तर्फ पाटण, धावडे, कोकिसरे, मानगाव, बेलवडे, कुसरुंड, नाटोशीवाडी, कोतावडे, आडदेव, आब्रुळे, चोपडी, त्रिपुडी, गव्हाणवाडी, गारवडे, सांगवड, मारूलहवेली, साजूर मोरगिरी या गावातील शेतकरी सध्या मोरणा – गुरेघर प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत आहेत.