सुमी (युक्रेन) – आम्ही चालत रशियाच्या सीमेकडे जाऊ. आमच्या जीविताला असणारा धोका स्वीकारायला आम्ही तयार आहोत. भारत सरकार आमची सुखरूप सुटका करेल, याची अजून वाट पाहण्याची आमची इच्छा नाही, असे सुमी विद्यापीठात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुमारे 800 जणांच्या गटाने आज सांगितले.
एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात सहकारी विद्यार्थ्यांसमवेत उभी असणारी एक विद्यार्थीनी म्हणते, आम्ही सुमी विद्यापीठातील विद्यार्थी आहोत. हा युध्दाचा दहावा दिवस आहे, दोन शहरात मानवता कॅरिडोरसाठी रशियाने शस्त्रसंधी जाहीर केल्याचे आम्ही आज ऐकले आहे. त्यातील एक मरिउपोल हे शहर येथून 600 किमीवर आहे.
आम्ही सकाळपासून बॉम्बचा मारा… तोफगोळ्यांच्या मारा आणि रस्त्यवरील युध्दाचे आवज ऐकत आहोत. आम्हाला भीती वाटते. आम्ही खूप वाट पाहिली आणि यापेक्षा अधिक वाट आम्ही पाहू शकत नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सीमेकडे जात आहोत. जर आम्हाला काही झाले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी दुतावास आणि सरकारची असेल. जर दुर्देवाने आमच्यापैकी कोणाच्याही जीविताचे बरे वाईट झाले तर ते ऑपरेशन गंगाचे सर्वात मोठे अपयश असेल.
त्यानंतर आणखी एक विद्यार्थीनी म्हणते, हा सुमी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अखेरचा व्हिडिओ असेल. आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही आमच्या जबाबादारीवर जात आहोत. त्यावेळी आणखी एक विद्यार्थी ओरडतो, आम्हाला आमच्या सरकारची गरज आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थी घोषणा देतात, भारत माता की जय…
सुमी विद्यापीठात अडकलेल्या 800 भारतीय विद्यार्थ्यांच्या पालक भारतात काळजीत आहेत. सातत्याने होणाऱ्या बॉम्बिंगमुळे त्यांच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामूळे पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना बर्फ गोळा करून वितळवावा लागत आहे.
माझ्या बहिणीला मी सकाळी फोन केला होता. त्यावेळी युक्रेनमध्ये पहाटेचे सहा वाजले होते. त्यावेळी बॉम्बिंगचा आवाज ऐकू येत होता. मुलांना अशा स्थितीत बर्फ गोळा करण्यासाठी बाहेर पडावे लागते. ते वितळवूनच त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कराव्या लागतात. त्यांची लवकरच सुटका करू, असे आश्वासन सरकार देत आहे. पण त्यात स्पष्टता नसल्याने हे विद्यार्थी आशा सोडत आहेत.
डॉ, प्रियंका आहेर,
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थीबनीची बहीण