नवी दिल्ली – भारतामधील तरुणांमध्ये स्वदेशी ऍप विकसित करण्याची क्षमता आहे. या क्षमतेचा वापर करून तरुणांनी भारताला जागतिक ऍप केंद्र बनवावे, असा आग्रह केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
त्यासाठी भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि नेसकॉमने पुढाकार घ्यावा, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. यासंदर्भातील तरुणांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. भारताने माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. मात्र, डिजिटल सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी शक्यतो सर्व बाबी देशातच तयार करण्याची गरज आहे. याबाबत आपण परावलंबी राहिलो तर आपल्याकडील माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.
त्यामुळे भारताने काही ऍपवर बंदी घातली आहे, याची आठवण प्रसाद यांनी करून दिली. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नेसकॉमने या कामी पुढाकार घेऊन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्ट ऍप्ना मदत करण्याची गरज आहे. भारतीय तरुणांच्या ऍप विकसित करण्याच्या क्षमतेबद्दल मला काडीचेही शंका नाही. मात्र, या अगोदर आयातीचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपण या विषयावर लक्ष दिले नव्हते. मात्र, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता, या क्षेत्रात आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. यासाठी या क्षेत्रात तरुणांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.