राहुरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुक्कडवेढे येथील बारावी शास्त्र शाखेत शिकणार्या कुणाल प्रकाश चौधरी (वय 17) या तरुणाने बारावीत परीक्षेत नापास होईल, या भीतीने निकालाच्या आदल्या दिवशी रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात मात्र तो उत्तीर्ण झाला. असे असला तरी नापास होण्याच्या भीतीने त्याला जीव गमवावा लागला.
चांगल्या गुणांनी कुणाल पास
बारावीच्या परीक्षेत नापास होईल, अशी भीती असलेला कुणाल मात्र चांगल्या गुणांनी पास झाला. कुणालने अविचाराने टोकाचे पाऊल उचलल्याने जीव गमविला. कुणालाचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेला असून त्याच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे.
राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील कुणाला हा आर्ट्स, कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये बारावीच्या इयत्तेत शिकत होता. दरम्यान आठ जून रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली होती. त्यामुळे दि. 7 रोजी निकालाच्या आदल्या दिवशी रात्री सर्वांसमवेत जेवण करून कुणाला आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला. त्यानंतर पुन्हा रात्री उशिराने वडिलांना पिण्यासाठी पाणी आणून दिले आणि आपल्या खोलीचा दरवाजा पुन्हा आतून बंद करून घेतला.
त्यानंतर वडील प्रकाश, आई सुवर्णा व छोटा भाऊ प्रज्वल शेजारील खोलीत झोपले होते. बुधवारी सकाळी सात वाजले तरी ही कुणाल का उठला नाही, हे पाहण्यासाठी आई सुवर्णा खिडकीतून डोकावून बघितले असता कुणाल फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. भयावह प्रसंग डोळ्यासमोर पाहून माता गलितगात्र झाली. मोठ्याने एकच हंबरडा फोडला. या आवाजामुळे शेजारील नागरिक जमा झाले. तत्काळ सदर घटनेची माहिती वांबोरी पोलिसांना देऊन कुणालचा मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दुपारी तीनच्या सुमारास कुणालच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलादार दिनकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप दबडे करीत आहेत.