औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुप्रतिक्षीत सभा आज सुरू झाली. उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांवर टीका करत आपण राजकीय भाष्य करणार नसल्याचं म्हटलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी टीव्हीवर पाहात होतो की, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, त्यांच्या निशाण्यावर कोण असणार अशा बातम्या सुरू होत्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ढेकणं चिरडण्यासाठी तोफांची गरज नसते, म्हणत विरोधकांना टोला लगावला.
मला हे विचारतात, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार ? हे मला काय विचारतात. विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव देण्याची मागणी केली. त्यावर हे काहीच बोलणार नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार हे वचन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्याआधी मी औरंगाबाद शहराचा विकास करणार आहे. शहरात पाणी नाही, रस्त्यावर खड्डे असतील संभाजीराजे मला टकमकटोक दाखवतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने त्यांच्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर काय बोलायच हे सांगाव. वाटेल ती टीका करायची. हे जमणार नाही. आम्ही त्या पातळीवर जावू शकत नाही, असा विचार करू नका. आमचे प्रवक्ते आणि शिवसैनिक वाटेल त्या भाषेत प्रत्युत्तर देईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपच्या महिला प्रवक्त्यांनी प्रेषीतांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशाचं राजकारण तापलं आहे. अरब देशासमोर भारताला मान खाली घालावी लागली. माफी मागावी लागली. आपल्या पंतप्रधानांचा फोटो कचरा पेट्यांवर लावण्यात आला. कोण टिनपाट प्रवक्त्यामुळे आपल्याला माफी मागावी लागते. भाजपमुळेच भारताला अरब देशांना माफी मागावी लागल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.