नाशिक- शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता, याचे भान तुम्ही ठेवायला हवे, असा सल्लाही राज यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
राज ठाकरे हे दोन दिवशीय नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी नाशिक शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. तत्पूर्वी, रविवारी सकाळी त्यांनी शेतकऱ्यांची बैठक त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बॅंकेची सक्तीची वसुली, कांदा दर घसरण आणि ईतर विषयावर चर्चा करण्यात आली. राज यांनी यावेळी शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन करत आवाज उठविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळणार नाही, तुम्ही सर्वानी एकत्र येऊन हा लढा उभारणे आवश्यक असल्याचे म्हटले.
राज बोलताना पुढे म्हणाले, ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केले ना? असे सांगत “जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता..याचे भान तुम्ही ठेवायला हवे..’ असे आवाहन देखील त्यांनी केले. राज ठाकरे या दौऱ्यात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.