मुंबई : भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. ”भू-विकास बँक अस्तित्वात तरी आहे का?” असा सवाल त्यांनी सरकारला विचारला होता. शरद पवारांच्या या टीकेला भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर देत “शेतकरी किंवा कार्यकर्ते परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचं महत्त्व वाढत नाही, असं राजकारण त्यांनी अनेक वर्षांपासून केलं आहे. त्यामुळे या निर्णयाचं त्यांना दु:ख होणं स्वाभाविक आहे” असे ते म्हणाले होते. त्यातच आता विखे पाटलांच्या या टीकेला आमदार निलेश लंके यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
विखे पाटलांच्या टीकेला उत्तर देताना “केंद्रीय मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. युपीएच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारलं की देशाचे कृषीमंत्री कोण आहेत, तर तो शेतकरी शरद पवार यांचे नाव घ्यायचा. मात्र, आता देशाचे कृषीमंत्री कोण आहेत? हे शेतकऱ्यांना माहिती नाही. तसेच राज्याच्या कृषीमंत्र्यांना म्हटलं की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तर ते म्हणतात, पाऊसच झाला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं योग्य नाही. शेतकऱ्यांबद्दल जेवढी आत्मीयता शरद पवारांमध्ये आहे, तेवढी या देशातील कोणत्याच नेत्यामध्ये नाही. माझ्या दृष्टीने शरद पवार यांच्यावर टीका करावी, इतकी तुमची उंची नाही”, असे प्रत्युत्तर आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,“आज राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. ते यावेळी शेतकऱ्यांना निश्चित आधार देतील, असे वाटले होते. मात्र, पालकमंत्र्यांचा दौरा हा केवळ पर्यटन दौरा झाला. अत्यंत घाईत त्यांनी हा दौरा केला. रस्त्यावरूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली”, अशी टीकाही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.