सातारा (प्रतिनिधी)- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात चेहऱ्यावर मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही बंदी घातली आहे. प्रशासन विविध उपाययोजना राबवत असतानाही अद्यापही काही नागरिक या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. “तुम्ही शक्तीमान नाही… मास्क वापरा,’ असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर आता पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात करोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांसह जनजागृती केली. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन वारंवार करत असतानाही या आवाहनाला काही नागरिक प्रतिसाद देताना दिसत नाही. विविध कारणे सांगून घरातून बाहेर पडण्याचे प्रकार सुरुच आहेत. जिल्ह्यात सुरुवातीला करोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, कराड तालुक्यात सर्वाधिक 23 आणि जावळी तालुक्यात 6 अशा आकड्यांनी जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 33 वर पोहोचला आहे. एकमेकांशी संपर्क राहिल्यानेच करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरामधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे यापूर्वीच बंधनकारक केले होते. परंतु, शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले. या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी करावी. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दंडाची वसूली केल्यास ती संबंधित स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाया गतीमान झाल्या.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिस अधिकारी, कर्मचारीही जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलिस प्रशासन वारंवार नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. विनाकारण चारचाकी, दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करत आहे. अनेक वाहने जप्त करण्यात आली आहेत. शहरातील चौकाचौकात पोलिस वाहनचालकांना अडवून त्यांची जनजागृती करत आहेत. मात्र, नागरिकांना गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे. “तुम्ही शक्तीमान नाही… मास्क वापरा’ असे आवाहनही पोलिस करताना दिसत आहेत. जे नागरिक प्रशासनाच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनीही करोनाच्या संकटाचे गांभिर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
चेहऱ्यावर मास्क वापरल्याने विविध प्रकारचे संसर्गाने होणाऱ्या आजारापासून संरक्षण होते. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नेहमीच चेहऱ्यावर मास्क वापरतात. संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व इतरांच्या आरोग्यासाठी मास्क फायदेशीर ठरते. सध्या करोना संसर्गाने होत असल्याने नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क वापरुन प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांवर दंडात्मक कारवाई होत असली तरी प्रत्येकाने स्वत:च त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
– डॉ. सुहास माने,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा.