मायणी (प्रतिनिधी)- करोना संकटात हातावर पोट असलेल्या व गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच प्रकारे छत्तीसगडमधील मुंगेली येथून (ता. सिलतारा, जि. लोरमी) येथून धोंडेवाडी, ता. खटाव येथे दोन महिन्यांपूर्वी आलेल्या सहा कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. आम्हालाही मदत मिळू द्या, अशी आर्त विनवणी या कुटुंबांकडून केले जात आहे.
धोंडेवाडी येथे बांधकामासाठी पुण्याच्या ठेकेदाराने दोन महिन्यांपूर्वी या लोकांना छत्तीसगडमधून मजूर म्हणून आणले होते. अचानक लॉकडाउन झाल्यानंतरचे काही दिवस या कुटुंबांनी कसेबसे काढले. या कुटुंबाची जबाबदारी ठेकेदाराने घ्यायला हवी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. या कुटुंबांमध्ये काही लहान मुले आहेत.
लहान मुलांना दिवसभर काही ना काही तरी खायला लागत असते; परंतु या कुटुंबांमधील लहानग्यांना केवळ सकाळ आणि संध्याकाळी मिळेल तेवढ्या अन्नावर भूक भागवावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून मायणीतील अन्नछत्रातून या लोकांना सकाळ-संध्याकाळचे जेमतेम जेवण मिळत आहे. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे या कुटुंबांमधील लोकांनी सांगितले. त्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणापासून थोड्या अंतरावरील छोट्या बंधाऱ्यात आतापर्यंत असलेले थोडेफार मासे केवळ भाजून खाऊन दिवस काढल्याचे या लोकांनी सांगितले.
लॉकडाऊन उठेपर्यंत प्रशासनाने आम्हाला जगण्यापुरते अन्नधान्य पुरवावे किंवा आम्हाला आमच्या गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या कुटुंबांमधील भुवनेश्वरी यादव यांनी केली आहे.