विशेष पथकेही तैनात : करोना संसर्ग रोखण्याचे आव्हान
पुणे – करोनाच्या सावटामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. तसेच मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी पोलिसांचा बंदोबस्त मात्र दरवर्षीप्रमाणेच असणार आहे. या बंदोबस्तात करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार आहे.
बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, सातशे अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल. पाचही परिमंडळांच्या भरारी पथकांबरोबरच गुन्हे शाखेच्या 100 कर्मचाऱ्यांचेही भरारी पथक असणार आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक आणि वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्तात समावेश असेल.
गणेशोत्सवासंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक तथा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, सहआयुक्त रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, संभाजी कदम उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाले, “करोना संसर्गाचा धोका कायम आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणत आहोत. आपण इतके दिवस काळजी घेतली आणि आणखी काही दिवस काळजी घेऊया. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक कुटुंबातून चार नागरिक जरी रस्त्यावर आले, तरीही ही संख्या सुमारे 25 लाख होईल. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने वेळोवेळी बैठका घेतल्या आणि नागरिकांना आवाहन केले आहे. सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, “नामवंत कलावंतांना सोबत घेऊन ध्वनीचित्रफित तयार केली आहे. त्याच्या मदतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.’